परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे सध्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर आहेत. मराठा-कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ते रद्द केले, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवरच ३० ऑगस्ट रोजी परभणीत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा शेतकरी मेळावा रद्द करा, अशी मागणी करणारा फोन जरांगे पाटील यांनी संजय जाधव यांना केला होता. परंतु ऐनवेळी सभा रद्द करणे शक्य नाही, असे म्हणत जाधव यांनी हा मेळावा घेतला. त्यानंतर मराठा समाजाकडून संजय जाधव यांना मोठा विरोध झाला.
जरांगे पाटील यांनीही आता तुम्हाला पुन्हा गुलाल कसा लागतो हेच पाहतो? असा इशारा दिला. दरम्यान, या तानातानीनंतर संजय जाधव यांनी दरवर्षी आयोजित करण्यात येणारा परभणी शहरातील दहीहंडीचा कार्यक्रम रद्द केला आहे.
अर्थात राज्य विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता दहीहंडीचे आयोजन करणे आपल्याला संयुक्तिक वाटत नसल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे. मागील ३२ दिवसांपासून परभणी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. दुसरीकडे समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
या परिस्थितीची जाणीव ठेवत राजे संभाजी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा 'माखनचोर दहीहंडी' कार्यक्रम यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पाऊस पडून बळीराजाच्या शेतात पुन्हा हिरवाई नांदावी, त्याच्या कष्टाला यश मिळावे आणि समाजाच्या मागण्यांना न्याय मिळावा, ही मनापासून प्रार्थना, असे म्हणत खासदार संजय जाधव यांनी या निमित्ताने केली आहे.