Pune
कात्रज घाट परिसरात भारतीय जनता पक्षाच्या प्रचार यंत्रणेतील बिनवापरलेले साहित्य मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागेत फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या साहित्यामध्ये भाजपचे झेंडे, टोप्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट आढळून आले.
हजारो किलो वजनाचे हे साहित्य थेट घाट परिसरात टाकण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या प्रश्नाबरोबरच स्वच्छतेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणाचे ब्रँड ॲम्बेसिडर विक्रांत सिंग यांनी घटनास्थळी पाहणी करून या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यांनी स्वतः पुढाकार घेत घाट परिसरातील टाकून दिलेले साहित्य गोळा करून स्वच्छता केली. संवेदनशील आणि निसर्गरम्य कात्रज घाटात अशा प्रकारे प्रचार साहित्याची विल्हेवाट लावणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. घाट परिसरात आढळलेल्या साहित्यामध्ये भाजपचे अधिकृत झेंडे, टोप्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. प्रचारासाठी तयार करण्यात आलेले आणि वापरात न आलेले हे साहित्य योग्य पद्धतीने पुनर्वापर किंवा पुनर्विल्हेवाट करण्याऐवजी थेट मोकळ्या जागेत टाकण्यात आल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रचार साहित्याच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. त्यामुळे वापरात न आलेल्या साहित्याची जबाबदारीने विल्हेवाट लावणे किंवा त्याचा पुनर्वापर करणे अपेक्षित असताना ते सार्वजनिक ठिकाणी फेकले गेल्याने संबंधित यंत्रणेच्या व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत विक्रांत सिंग यांनी कात्रज घाटासारख्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील परिसरात मोठ्या प्रमाणावर न वापरलेले प्रचार साहित्य टाकणे बेजबाबदारपणा असून अशा प्रकारच्या कचऱ्यामुळे परिसराच्या स्वच्छतेबरोबरच पर्यावरणावरही परिणाम होत असल्याचे म्हटले.
एकीकडे शहरभर स्वच्छतेचे संदेश देत नागरिकांना कचरा न टाकण्याचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे राजकीय पक्षाशी संबंधित प्रचार साहित्यच सार्वजनिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी आढळून आल्याने स्वच्छतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबात महापालिका प्रशासनाने हा विषय वनविभागाच्या हद्दीत येत असल्याचे सांगितले आहे. तर, वनविभागाचे हवेली तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकिशोर पाटील यांच्याशी संपर्क केला असता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.