Pune
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. ई- २० इथेनॉल धोरणामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत नागरिकांनी गडकरींकडे मोर्चा वळवला आहे.
भारतीयांना इथेनॉल मिश्रित पेट्रोलसह शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचा निर्णय ग्राहकांना उपलब्ध व्हावा, यासाठी इंस्टाग्राम या समाजमाध्यमावर ई -२० जनता पार्टी या नावाने एक अकाऊंट तयार केले असून साडेचार लाखांहून अधिक नागरिकांनी त्याला पाठिंबा दिला आहे.
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर महिनाभराहून अधिक काळ विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तरुणांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष मारहाण केल्यानंतर देशभर वातावरण पेटले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आणखी बळ मिळाले. दिवसेंदिवस वाढणाऱ्या विरोधामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर शनिवार, २५ जुलै रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनतर देशभरातील तरुणांनी जोरदार जल्लोष साजरा केला.
या जल्लोषादरम्यान रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याचीही मागणी जोर धरू लागली. गेल्या अनेक दिवसांपासून ई-२० इथेनॉल धोरणामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा आरोप होऊ लागला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्य नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागत असल्याने आता गडकरींचा राजीनामा मागितला जात आहे. दादरमध्ये रविवारी झालेल्या जल्लोष मेळाव्यात लोकप्रिय शब्दप्रयोग, मीम संस्कृती, चित्रपटांतील संवाद, लोकप्रिय गाणी यांचा वापर करून आंदोलकांनी गडकरी यांच्या राजीनाम्याबाबत फलकही झळकविले.
दरम्यान, ई – २० इथेनॉल-मिश्रित इंधन धोरणाच्या निषेधार्थ आणि गडकरी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी येत्या ३१ जुलै रोजी संसद मार्गाकडे बाईक रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी दिल्लीतील टॅक्सी आणि परिवहन संघटना संसदेवर मोर्चा काढणार आहेत. दरम्यान, गाड्यांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल टाकल्यामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या आरोपांमध्ये वाढ होत आहे.