Pune
महावितरणच्या ग्राहकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात आलेल्या संदेशामुळे स्मार्ट मीटरबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ज्यांच्या घरी अद्याप स्मार्ट मीटर बसविण्यात आलेले नाही, त्यांचे विद्यमान मीटर ४८ तासांनंतर बदलून स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असल्याची पूर्वसूचना या संदेशातून देण्यात आली आहे.
मीटर बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे. दरम्यान अनेकांचा या मीटरला विरोध असतांनाही या संदेशाने पून्हा राज्यात वाद पेटण्याची चिन्ह आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाचे काय ?
मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ग्राहकांकडे सक्तीने स्मार्ट मीटर लावले जाणार नसल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही महावितरणकडून ग्राहकांच्या व्हाॅट्सॲवप थेट संदेश केल्याने आश्वासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दुसरीकडे आजही अनेक ग्राहकांचा स्मार्ट मीटरला विरोध आहे. त्यानंतरही हे मीटर सक्तीने बसवण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यभरात पून्हा वाद वाढण्याची शक्यता आहे. या विषयावर लोकसत्ताने महावितरणच्या जनसंपर्क विभागाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यास थोड्या वेळात कळवले जाईल, असे सांगण्यात आले.
ग्राहकांना नेमका कोणता संदेश पाठविण्यात आला आहे?
महावितरणने ग्राहकांना व्हॉट्सॲपवर पाठविलेल्या संदेशात, स्मार्ट मीटर नसलेल्या ग्राहकांचे सध्याचे वीजमीटर ४८ तासांनंतर बदलण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. हा संदेश मीटर बदलण्याबाबतची पूर्वसूचना असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.