आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Pune Metro : हिंजवडीतील IT कंपनीने रातोरात गाशा गुंडाळला, अन् 700 तरुण रस्त्यावर

नितीन देशपांडे   196   04-06-2026 10:46:38

Pune 

पुण्यातील हिंजवडी परिसरात उघडकीस आलेल्या कथित आयटी भरतीतील फसवणुकीच्या प्रकारामुळे 500 ते 700 तरुणांचे करिअर धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. महाराष्ट्रासह देशातील विविध भागांतून आलेल्या फ्रेशर विद्यार्थ्यांनी या प्रकरणात तक्रारी दाखल केल्या आहेत.

नोकरी, इंटर्नशिप आणि आकर्षक वार्षिक पॅकेजचे आश्वासन देत विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये सामील करून घेण्यात आलं. त्यानंतर प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन देण्यात आले. काही विद्यार्थ्यांना अधिकृत ऑफर लेटरही देण्यात आले होते. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरची मोठी स्वप्ने दाखवण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

वार्षिक साडेपाच लाख रुपयांपर्यंतच्या पॅकेजची हमी देऊन फसवणूक

तक्रारीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये विविध महाविद्यालयांमध्ये कॅम्पस रिक्रुटमेंटच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात आली. विद्यार्थ्यांना सुरुवातीला दोन महिन्यांचे प्रशिक्षण, त्यानंतर इंटर्नशिप आणि पुढे कामगिरीच्या आधारे कायम नोकरी देण्याचे सांगण्यात आले. याचबरोबर वार्षिक साडेपाच लाख रुपयांपर्यंतच्या पॅकेजची हमीही देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांकडून लॅपटॉप, राऊटर आणि इतर सुविधा देण्याच्या नावाखाली प्रत्येकी 15 हजार रुपये डिपॉझिट म्हणून घेण्यात आल्याचा आरोप आहे. ही रक्कम कंपनीच्या खात्यात न जाता वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी काम सुरू केले, मात्र त्यांना अपेक्षित वेतन मिळाले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

अनेक महिने काम करुनही रुपया दिला नाही

काही महिन्यांनंतर विद्यार्थ्यांनी कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचे सांगितले जात आहे. एप्रिल 2026 मध्ये काही विद्यार्थी कंपनीच्या हिंजवडीतील कार्यालयात पोहोचले असता कार्यालय बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी एकत्र येत संपर्क साधला आणि सुमारे 500 ते 700 जणांचा गट तयार झाला. या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह इतर राज्यांतील तरुणांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. काहींनी इंटर्नशिप केली होती, तर काहींनी अनेक महिने काम केल्याचा दावा केला आहे. मात्र वेतन न मिळाल्याने आणि कार्यालय बंद झाल्याने फसवणूक झाल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली.

या प्रकरणात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भानुदास ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, विविध प्रकल्प आणि स्टार्टअपच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात आली होती. अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कामासाठी नियुक्त करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणात महाविद्यालयांची भूमिका, भरती प्रक्रियेची पडताळणी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.