Pune
महाराष्ट्राच्या राजकारणात (Political News) पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
अशा पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील एका प्रमुख नेत्याकडून (Political News) नाराजी व्यक्त होत असल्याच्या बातम्या येत आहेत. यात ठाकरेंच्या माजी महिला खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचे नाव चर्चेत आहे. त्या सध्या शिवसेनेवर नाराज असून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना (यूबीटी) खासदारांची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत प्रियांका चतुर्वेदी यांनी खडाजंगी केल्याचे सांगितले जाते. बैठकीत त्यांनी राज्यसभेची शिवसेनेची हक्काची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
तसेच खासदार संजय राऊत यांच्यावरही नाराजी दाखवत त्या बैठकीतून उठून गेल्या होत्या. यामुळे प्रियांका चतुर्वेदी भाजपकडे वळल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
प्रियांका चतुर्वेदी पुन्हा चर्चेत
नुकताच प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपच्या एका महत्त्वाच्या उपक्रमाला (Political News) ‘मिस्ड कॉल’ देऊन पाठिंबा दिला आहे. भाजपने नारीशक्ती वंदन अधिनियमचे जनसमर्थन वाढविण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला चतुर्वेदी यांनी मिस्ड कॉल देऊन पाठिंबा दर्शवला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षातील नेत्याकडून अशा प्रकारे पाठिंबा मिळाल्याने चर्चा अधिक तीव्र झाली.
मिस्ड कॉल दिल्यानंतर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी प्रियांका चतुर्वेदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि आभार मानले. याची माहिती स्वतः चित्रा वाघ यांनी दिली.
वाघ म्हणाल्या, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नारीशक्ती वंदन अधिनियमला मिस्ड कॉल देऊन राजकारणापलीकडे जाऊन महिलांच्या हक्कांसाठी उभे राहणे हीच खरी नारीशक्ती आहे." त्या दोघींमध्ये महिलांच्या सशक्तीकरणावर एकमत झाल्याचेही सांगितले जाते.
भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा
प्रियांका चतुर्वेदी यांच्या या कृतीमुळे त्यांच्या हातात लवकरच भाजपचे कमळ चिन्ह दिसेल, असे राजकीय विश्लेषक आणि नेते बोलू लागले आहेत. मात्र, राज्यातील भाजपच्या सर्वोच्च नेत्यांकडून अद्याप याबाबत स्पष्ट ‘ग्रीन सिग्नल’ मिळालेला नसल्याचे सांगितले जाते. त्यांचा पक्षात प्रवेश होणार का? याकडे राजकीय लोकांचे लक्ष लागले आहे.