Pune
एचएसआरपी (High Security Registration Plate) नंबरप्लेट बसवणे राज्यात अनिवार्य करण्यात आले असताना अजूनही लाखो वाहनधारकांनी नियमांचे पालन केलेले नाही. अंतिम मुदत उलटून गेल्यानंतरही शासनाने दीड महिन्याची अतिरिक्त मुदत दिली होती.
मात्र, तरीही अनेक वाहनांवर नंबरप्लेट बसवलेली नाही. त्यामुळे आता परिवहन विभागाने कठोर कारवाई सुरू केली आहे.
वाहनांची ओळख सुरक्षित आणि प्रमाणित करण्यासाठी एचएसआरपी नंबरप्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. या प्लेटमध्ये विशेष सुरक्षा फीचर्स असल्यामुळे चोरी, बनावट नंबरप्लेट आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे सोपे होते. त्यामुळेच सरकारने हा नियम कडकपणे लागू केला आहे.
अजून लाखो वाहनधारकांची प्रक्रिया अपूर्णच
2 मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यातील फक्त 50 टक्के वाहनधारकांनीच एचएसआरपी नंबरप्लेट बसवली आहे. सुमारे 1 कोटी 2 लाख वाहनधारकांनी रजिस्ट्रेशन केले असले तरी त्यापैकी फक्त 88 लाख वाहनांवर नंबरप्लेट बसवण्यात आली आहे. म्हणजेच अजून लाखो वाहनधारकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
आता करावा लागणार थेट दंडाचा सामना
परिवहन विभागाने फेब्रुवारीपासूनच कारवाईला सुरुवात केली आहे. अंतिम मुदत आणि अतिरिक्त वेळ दिल्यानंतरही नियम पाळला नाही, तर आता वाहनधारकांना थेट दंडाचा सामना करावा लागणार आहे. वाहतूक पोलिसांकडून तपासणी मोहिमा राबवल्या जात असून, नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
दंड किती भरावा लागणार?
एचएसआरपी नंबरप्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांना 1,000 रुपयांपासून ते 10,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. जर नंबरप्लेटशिवाय वाहन चालवताना आढळले, तर तात्काळ कारवाई होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.