माण प्रतिनिधी : साई शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आर्चिवल कॅम्पस इंटरनॅशनल स्कूल माण यांच्या वतीने ग्रामीण,शहरी व आयटी नगरीतील विद्यार्थ्यांसाठी 'विज्ञान प्रदर्शन - ज्ञान आणि विज्ञानाची सुरेख सांगड' घालून आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय विज्ञान दिन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
इयत्ता 5 वी ते 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विज्ञान विषयातील विविध संकल्पनांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी जलचक्र, सौरऊर्जा प्रकल्प, विद्युत परिपथ, हायड्रॉलिक ब्रिज, पवनचक्की मॉडेल, ज्वालामुखीचे कार्यरत मॉडेल, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, मानवी श्वसनसंस्था, रक्ताभिसरण प्रणाली, पर्यावरण संवर्धन, रोबोटिक्सची प्राथमिक संकल्पना, गुरुत्वाकर्षणाचा परिणाम, चुंबकीय क्षेत्राचे प्रयोग अशा विविध विषयांवर आधारित आकर्षक व कार्यरत प्रकल्प सादर केले.
विद्यार्थ्यांनी केवळ मॉडेल्स सादर न करता त्यामागील वैज्ञानिक तत्त्वे आत्मविश्वासाने स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. शेखर महाराज जांभूळकर हे होते यावेळी ते म्हणाले की विज्ञान आणि अध्यात्म यांची सुंदर सांगड घालत विद्यार्थ्यांना जिज्ञासा, प्रयोगशील वृत्ती आणि सकारात्मक विचारसरणी जोपासण्याचे मार्गदर्शन केले.
यावेळी हभप अनिलजी पारखी,हभप
सोपाननाना पारखी,हभप गायक समीरजी गराडे ,अक्षयजी भरणे,मोहनजी खरात हे देखील उपस्थित होते.
“विज्ञान हे केवळ प्रयोगशाळेत मर्यादित नसून ते आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणी कार्यरत असते,” असे सांगत त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले.
संस्थेचे मार्गदर्शक श्री. नवनाथजी पारखी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विज्ञानातील नवकल्पना आणि संशोधन यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची सवय लावावी, अपयशाला घाबरू नये आणि सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवावी, असा प्रेरणादायी संदेश दिला.
संस्थापक अध्यक्षा सौ. युगंधरामॅम पारखी तसेच संस्था पदाधिकारी श्री. संजय दिवेकर सर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
मुख्याध्यापक श्री. शरद रामदास बाराते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विज्ञान दिन साजरा करण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट करत विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती विकसित करण्यावर भर दिला.
विज्ञान विषय शिक्षिका सौ. रेणुका नवले मॅम यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, सादरीकरण कौशल्याचे आणि आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक केले.