मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे आयबीएम कंपनीचे नवीन कार्यालय, 'द गेटवे टू विकसित भारत'चे उदघाटन संपन्न झाले.
यावेळी माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन आणि आयबीएम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये राज्य शासनाच्या क्वांटम मिशन आणि धोरणात्मक उपक्रमांना चालना देण्यासाठी लेटर ऑफ इंटेंट (एलओआय) वर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेसोबतच विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार होत आहे. या ध्येयपूर्तीसाठी आयबीएम कंपनीचे सहकार्य महत्त्वाचे असून, कंपनी आपले मोलाचे योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयबीएमने मुंबईमध्ये कार्यालय सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासन आणि आयबीएम एकत्रितपणे क्वांटम कॉम्प्युटिंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या तंत्रज्ञानांवर आधारित राज्याच्या विकासासाठी काम करतील. क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे व्यवसाय, प्रशासन, वित्त, सुरक्षा, लॉजिस्टिक्स आणि बाजारपेठ अशा सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल होत आहेत. महाराष्ट्र या तंत्रज्ञानाच्या सोबतीने प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर राहील.
कृषी क्षेत्रासमोर हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान निर्णायक ठरणार आहे. कृषी विकासासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात यश मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आयबीएम इंडिया आणि साऊथ एशियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पटेल, दक्षिण आशिया विभागाचे महाव्यवस्थापक हान्स डेक्कर व इतर मान्यवर उपस्थित होते.