मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, राज्यातील 5 प्रमुख ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 5 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित ज्योतिर्लिंगांतील प्रकल्पांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर करतील.
5 ज्योतिर्लिंगांसाठी नियुक्त वरिष्ठ अधिकारी पुढीलप्रमाणे:
✅ भीमाशंकर (पुणे) – व्ही. राधा, अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग
✅ घृष्णेश्वर (छत्रपती संभाजीनगर) – बी. वेणुगोपाल रेड्डी, अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग
✅ त्र्यंबकेश्वर (नाशिक) – सौरभ विजय, प्रधान सचिव, वित्त विभाग
✅ औंढा नागनाथ (हिंगोली) – रिचा बागला, प्रधान सचिव, वित्त विभाग
✅ परळी वैजनाथ (बीड) – आप्पासाहेब धुळाज, सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग
या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांना संबंधित उच्चाधिकार समित्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून त्यानुसार शासन निर्णयही काढण्यात आले आहेत. श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यातील ₹148 कोटी 37 लाखांच्या सुमारे 11 कामांना मान्यता देण्यात आली आहे. घृष्णेश्वर विकास आराखड्याची एकूण रक्कम ₹156 कोटी 63 लाख इतकी आहे. त्र्यंबकेश्वरसाठी 275 विकास आराखडा ₹15 कोटी 21 लाखांचा आहे. परळी वैजनाथसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यांत ₹286 कोटी 68 लाखांच्या 92 कामांना मंजुरी मिळाली आहे.
या सर्व प्रकल्पांना गती मिळावी, कामांची गुणवत्ता अबाधित राहावी आणि योग्य नियोजनानुसार ती अंमलात यावीत यासाठी संबंधित अधिकारी नियमितपणे समन्वय साधणार आहेत. राज्य शासनाच्या स्तरावर प्रथमच अशा प्रकारे थेट मंत्रालयीन समन्वयासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने या तीर्थक्षेत्र विकासाला नवी दिशा आणि वेग मिळणार आहे.