पुणे-
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला (भाजप) लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. माजी मंत्री आणि डोंबिवलीचे चार वेळा आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज प्रदेशाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यातील अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. उद्या (१ जुलै २०२५) संध्याकाळी चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे. ही निवड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्या निवडीचे समर्थन करताना त्यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. "रवींद्र चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली. त्यानंतर ते नगरसेवक, आमदार आणि मंत्री झाले. त्यांनी नेहमीच पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे," असे फडणवीस यांनी सांगितले.
चव्हाण यांनी २००९ पासून डोंबिवली मतदारसंघातून सलग चार वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. याशिवाय, त्यांनी महायुती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे.