मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ‘श्री गुरु तेग बहादुर साहिब जी 350 वी शहीदी तसेच गुरु गोविंदसिंह जी 350 वी गुरू ता गद्दी समागम समिती, महाराष्ट्र राज्य’ची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी उपस्थित संत-महंतांसमवेत संवाद साधला.
यावेळी श्री गुरु तेग बहादुर साहेब जी यांचा 350 वा शहिद समागम आणि गुरुगोविंद सिंग जी यांचा 350 वा गुरु ता गद्दी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यात तीन ठिकाणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. समागमाचे आयोजन नांदेड येथे 15 व 16 नोव्हेंबर, नागपूर येथे 6 डिसेंबर, नवी मुंबई येथे 21 व 22 डिसेंबर 2025 दरम्यान करण्याचे नियोजन आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, संघर्षाच्या काळात समाजाचे शोषण होत असताना गुरु तेग बहादूर यांनी समाजासाठी समर्पण केले. औरंगजेबाच्या जुलमी राजवटीत होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी लढा दिला. समाजासाठी ते शहीद झाले, हा इतिहास पुढील पिढीला कळणे अत्यंत आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत या कार्यक्रमांमधून श्री गुरु तेग बहादुर साहेबजी व गुरुगोविंद सिंगजी यांचा इतिहास निश्चितच पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविता येईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, संस्कृती आणि देशाच्या मजबुतीकरणासाठी लढणाऱ्या लोकांचा हा कार्यक्रम असणार आहे. वेगवेगळे समाज एकत्र येऊन हा समागम कार्यक्रम होणार आहे. या सर्वांच्या एकजुटीतून देश घडविण्याची आणि आपला इतिहास समागमाच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याची ही एक संधी असल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी राज्यस्तरीय समितीचे मार्गदर्शक संत ज्ञानी हरनाम सिंहजी खालसा, धर्मगुरू संत श्री बाबूसिंह महाराज, संत रघुमुनीजी महाराज, गोपाल चैतन्य जी महाराज तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.