पुणे (Pcmctahalka.in)
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जयंत पाटील राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा, अशी विनंती शरद पवार यांना केली.
जयंत पाटलांना भाषणाच्या शेवटी केलेल्या या जाहीर वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीमधील एक गट जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहे. त्यामुळे जयंत पाटलांचे वर्धापनदिनी राजीनाम्याचं सूतोवाच करणे मोठी राजकीय घडामोड आहे.
जयंत पाटील यांनी म्हटलं की, शरद पवार यांनी मला प्रदेशाध्यक्षपदाची बरीच संधी दिली. सात वर्षांचा मोठा कालवधी मला मिळाला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांच्या आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे.
जयंत पाटलांनी राजीनाम्याबाबत वक्तव्य करण्याआधीच उपस्थित कार्यकर्त्यांना गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे जयंत पाटील यांचं बोलणं अपूर्णच राहिलं.
प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेण्याआधी माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श होता, ज्यांनी तमाम मराठी जनांच्या मनात स्वाभिमान आणि स्वराज्याचं बीज पेरलं. छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी प्राण सोडले पण स्वराज्याशी प्रतारणा केली नाही, अहिल्यादेवी होळकर यांचं ज्यांनी हरहुन्नरीने आपल्या राज्याचा कारभार हाकला, महात्मा ज्योतिबा फुले यांचं ज्यांनी सर्वात आधी समतेचा विचार मांडला, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा ज्यांनी आपल्या देशात समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्यांनी समतेसाठी निर्णायक चळवळ उभी केली, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ज्यांनी बहुजनांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचा ज्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया रचला, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
2018 च्या शेवटापर्यंत परिस्थिती प्रचंड बदलेली होती. अनेक जण पक्ष सोडून जात होते. मी त्या काळात वारंवार म्हणायचो की आमची लढाई ही भाजपसह इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग यांसोबत आहे. 2019 च्या तोंडावर लोकसभा निवडणुका लागल्या होत्या. पुलवामा हल्ला झाला होता त्यामुळे देशात लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा हवे तसे यश पक्षाला मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 4 जागा निवडून आल्या, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.