नगर- राज्यात दोन दिवसांपासून अवकाळीचा तडाखा बसत आहे. वादळी वा-यासह पाऊस होत असल्याने आंबा, द्राक्षासह फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच अनेक ठिकाणी छतावरील पत्रे उडाले तर उन्हाळी पिके आणि रबीची पिकेही आडवी झाली. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. सातारा जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या यलो आणि ऑरेंज अलर्टनंतर सलग दुसऱ्या दिवशी कराड आणि पाटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.
या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. लाईटचे पोल पडल्याने रात्रभर अंधारात वेळ काढावी लागली. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका मका आणि शाळू पिकाला बसला असून, आंबा फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छप्पर उडाले, पत्रे दूर फेकले गेले. नागरिकांचेही मोठे नुकसान झाले. आधीच कालच्या अवकाळी पावसामुळे अनेक घरांचे, गोठ्यांचे पत्रे उडाले होते. अवकाळी पावसानं आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ऐन आंब्याच्या हंगामात कैऱ्या वाऱ्याने खाली पडल्याचे दिसून आले. राज्यात सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आदी भागांतही अवकाळी पावसाने हजेरी लावली. सध्या राज्यात रबीची काढणी सुरू आहे. त्यातच सध्या अंब्याचे सिझन आहे. मात्र, वादळी वा-यात कच्चे आंबे कोसळल्याने फळझाडांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.